पडद्यावर हिरोच्या जीवावर उठणारा हा अभिनेता प्रत्यक्ष जीवनात मात्र होता आयुर्विमा एजंट
सिनेमातील व्हिलन म्हटलं की उग्र दिसणारा, हावभावही तसेच असणारा आणि भारदस्त आवाज असलेला कलाकार आठवतो. पण तुमच्या आमच्या समोर व्हिलन म्हटलं की एकच नाव समोर येत ते म्हणजे अमरिश पुरी.
खर्जातील आवाज, धाक भरवणारा अभिनय आणि काळजाचा थरकाप उडवणारी नजर या सगळ्यांनी व्हिलनची अदाकारी कमाल पेश करणारे कलाकार म्हणजे अमरिश पुरी. पड्यावर अभिनयाने भल्या भल्यांना थरकाप उडवणारे अमरिशजी राज्य विमा महामंडळात कामाला होते.
सरकारी नोकरीसोबत सुरक्षित आयुष्याची स्वप्न बघण्याऐवजी अभिनेता होण्याचं स्वप्न अमरिश यांना पडू लागलं. पण हिरोला साजेसा चेहरा नसल्याने त्यांना हिरोच्या रोलसाठी नाकारण्यात आलं. पण अमरिशजींना अभिनयाची आवड स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी रंगभूमीकडे मोर्चा वळवला.
यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी सत्यदेव दुबेशी त्यांची भेट झाली. आणि त्यांच्या रुपाने अमरिशजींना नाट्यक्षेत्रातला गुरु मिळाला. 21 वर्ष सरकारी नोकरी केल्यानंतर अमरिशजींनी कलेला वाहून घेण्याचं ठरवलं. आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुर्णवेळ अभिनयासाठी देण्याचं ठरवलं. पण सिनेमाचा लाईम लाईट अमरिश जी यांच्यावर पडण्यासाठी मात्र बराच वेळ लागला.
वयाच्या 39 व्या वर्षी त्यांना सिनेमात ब्रेक मिळाला. ‘रेश्मा आणि शेरा’ या सिनेमात त्यांना भूमिका मिळाली. पण व्हिलन म्हणून ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते ‘विधाता’ या सिनेमात. खरं तर व्हिलन म्हणून ते ‘हम पांच’ सिनेमातही दिसले होते. पण विधाताने त्यांना क्रुर खलनायक म्हणून प्रस्थापित केलं.
तर ‘हिरो’ सिनेमाने त्यांच्या व्हिलनलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. रिजनल सिनेमांमध्येही अमरिशजींनी ठसा उमटवला होता. कन्नड सिनेमा तसेच शांतता कोर्ट चालू आहे या नाटकावर बेतलेल्या मराठी सिनेमातही अमरिश पुरी यांनी काम केलं होतं. पण इतक्यात थांबू नका. अमरिशजींच्या करिअरचा आलेख बॉलिवूड आणि रिजनल सिनेमाच नाही तर हॉलिवूडपर्यंतही गेला आहे.
Indiana jones and the temple of doom या प्रसिद्ध सिरीजमध्ये मोला राम ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. केवळ व्हिलनच नाही तर कधी कडक शिस्तीचे वडील तर कधी प्रेमळ आजोबा त्यांनी अगदी सहज साकारले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे अंधा कानून, कूली, मेरी जंग, तेरी मेहेरबानियां, मिस्टर इंडिया, त्रिदेव, राम लखन, घायल, फुल और कांटे, दामिनी, करण अर्जुन, घातक, कोयला या सिनेमांमधील त्यांच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. अनेक खलनायकी भूमिकांवर स्वत:चा एकछ्त्री अंमल करणारा हा अभिनेता 12 जानेवारी 2005 मध्ये हे जग सोडून गेला. त्यांची तुम्हाला आवडलेली भूमिका आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून सांगा.